बहुपत्नीकत्व ‘हलाला’साठी नवे घटनापीठ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मुस्लिम धर्मातील बहुपत्नीकत्व आणि ‘निकाह हलाला’ या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पाच सदस्यांच्या नव्या घटनापीठाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. वकील अश्विनी उपाध्याय यांनी या विषयावर जनहित याचिका दाखल केली होती. आधीच्या खंडपीठाचे दोन न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि हेमंत गुप्ता निवृत्त झाल्याने आता नव्या खंडपीठाची आवश्यकता असल्याचे उपाध्याय यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाला निदर्शनास आणून दिले. त्यावर सरन्यायाधीशांनी ‘आपण नवे घटनापीठ स्थापन करू,’ असे उत्तर दिले.

३० ऑगस्ट रोजी न्या. इंदिरा बॅनर्जी, हेमंत गुप्ता, सूर्यकांत, एम. एम. सुंद्रेश आणि सुधांशू धुलिया या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांना जनहित याचिकांमध्ये पक्षकार केले होते आणि या याचिकांप्रकरणी त्यांचे उत्तर मागितले होते. त्यानंतर न्या. बॅनर्जी या २३ सप्टेंबर आणि न्या. गुप्ता १६ ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले. त्यामुळे या घटनापीठाची पुनर्रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बहुपत्नीकत्व आणि निकाह हलाला या दोन्ही प्रथांना बेकायदा आणि घटनाबाह्य म्हणूज जाहीर करावे, अशी मागणी वकील अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकांप्रकरणी जुलै २०१८ मध्ये घटनापीठ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात फर्जना नावाच्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली होती आणि उपाध्याय यांच्या याचिकेची घटनापीठाकडून सुनावणी होणार असलेचे स्पष्ट केले होते.

काय आहे बहुपत्नीकत्व आणि  निकाह हलाला

बहुपत्नीकत्व : पुरुषांना एकाच वेळी चार विवाह करण्याची परवानगी

निकाह हलाला : घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या पतीशी पुनर्विवाह करण्यासाठी आधी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते, शारीरिक संबंध ठेवावे लागतात. त्यानंतर नवीन पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्या पतीशी लग्न करता येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *