
आधीच देशात महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली असताना केंद्र सरकारने ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. तसेच ज्या वस्तूंवर आधी जीएसटी होता, त्यात वाढ केली होती. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ माजविला होता. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने काही वस्तूंवरील जीएसटी मागे घेतली आहे.
केंद्र सरकारने सुट्या धान्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला होता. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हा जीएसटी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २५ किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५% जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. आधीच महागाई असताना केंद्राने जुलमी जीएसटी लावल्याने जनतेत रोष निर्माण होऊ लागला आहे.