स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाचे आरोप होत नाहीत: गुणरत्न सदावर्ते
ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने केला होता. मात्र, यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाच्या तक्रारी होत नाहीत, असे सदावर्ते यांनी म्हटले. ते शुक्रवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, “ओ जितेंद्र आव्हाड, ओ शरद पवार स्वत:ची बायको सोबत ठेवली तर विनयभंगाचे आरोप होत नसतात.” यावेळी सदावर्ते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील देखील होत्या. त्यांच्याकडे पाहत सदावर्ते यांनी म्हटले की, “हे असं खरं प्रेम सोबत ठेवायचं असतं. म्हणजे कोणीही तुमच्यावर विनयभंगाचे आरोप करु शकत नाही. आपण समाजातील महिला-भगिनींचा मान राखलाच पाहिजे,” असे सदावर्ते यांनी म्हटले.

स्वतंत्र मराठवाडा परिषदेसाठी गुणरत्न सदावर्ते उस्मानाबादमध्ये होते. यावेळी मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी रोडमॅप तयार करायचा आम्ही आलो आहोत. सकाळपासून कष्टकऱ्यांना पिटाळून लावण्यात आलं. या सर्व चौकशीच्या बाबी आहेत. साडेचार वाजता चक्र फिरले आणि दारं उघडले. याला म्हणतात रयतेचं सरकार, असेही सदावर्ते यांनी सांगितले.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पलटवार केला. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत:वर येरवाडा रुग्णालयात जाऊन उपचार करुन घेतले पाहिजेत. त्यांनी तरुणांची माथी भडकावू नयेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यापूर्वीही अंधारे यांनी सदावर्ते यांना फटकारले होते. गुणरत्न सदावर्ते हे कायमच आपल्या अतार्किक आणि असंबंध भाषा शैलीसाठी कुप्रसिद्ध आहेत. सदावर्तेंनी हे वकील आहेत की राजकारणी हे पहिल्यांदा ठरवावं, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *